आनंद-तरंग हा काव्यसंग्रह आपल्या हाती देताना आज मला मनस्वी आनंद होत आहे. बालपणापासूनच लहान-सहान काव्य तयार करण्याची आवड आहे. माझ्या परिवारातील सदस्यांनी माझ्या कवितेला चांगली दाद प्रतिसाद दिल्यामुळे आज त्या कवितांचे आनंद-तरंग मध्ये रुपांतर झाले. मी पहिली कविता लिहिली होती ती म्हणजे ८ जून २०१८ या दिवशी त्या वेळेस माझे आठवीचे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाले होते. त्यानंतर हा कवितेचा प्रवास अजूनही सुरूच आहे. सोशल मिडियावर सुध्दा माझ्या कवितेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याने माझे धाडस वाढले. माझ्या कवितेला माझ्या मित्रांकडून परिवाराकडून शिक्षकांकडून सुद्धा खूप प्रतिसाद मिळत असे. कवितेच्या प्रवासात मार्गदर्शक ठरलेले राजेश नागुलवार सरांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. माझ्या कविता इतरांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून कृष्णा समुद्रे पाटील सर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. तसेच मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रमोद सावंत सर यांनीसुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. काव्याप्रमाणेच कथा ही लिखाण करण्याची मला आवड आहे. ''विश्वास राग आरोप...!'' ही माझी पहिली कथा मी पहिल्यांदा शाळेत सादर केली होती. त्यानंतर या कथांच्या प्रवासामध्ये ''मैत्री'' ''आयुष्य'' ''अहंकाराशी झुंज'' ''कला एक अनमोल गुण'' इत्यादी कथांची भर पडली. आनंद-तरंग हे नाव का ? ह्याचे उत्तर या काव्यसंग्रहातील कवितेतच आहे ते म्हणजे कवितेतून इतरांना आनंद प्रदान करणे व त्याच आनंदातून ज्ञान-तरंग प्रदान करणे आहे. ह्या काव्यसंग्रहातील ७०% कविता ह्या विशिष्ट प्रसंगी लिहिण्यात आलेल्या आहेत. डॉ. सागर गुडमेवार उर्फ अर्थार्जुन