‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहात एकूण १०० कविता आहेत. या संग्रहातील कविता आणि त्यातील प्रतिमा यांच्यावर कवी ग्रेस यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कवितेत एक सहजता आहे. त्यातून त्यांची उपजत जाण दिसून येते. त्यांची अशी एक स्वतंत्र शैली आहे. त्यांच्या कवितेत नदीचा काठ भय व्याकुळता सावली अंधार कारुण्य आरसे अंगण घोडा अशा प्रतिमा त्यांनी वापरलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिमेतून त्यांची कविता फुलून येते तिची निर्मिती होते. काही कविता या अमूर्त चित्रासारख्या आहेत. काहींचा अर्थ लावता येत नाही. एकदा वाचून या कविता समजणार नाहीत. त्या पुन्हापुन्हा वाचल्यावर त्यातून वेगवेगळे अर्थ वाचकाला समजून येतील. या संग्रहात काही मुक्तछंदाच्या कविताही आहेत. या संग्रहातील सर्व कविता उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत ही विशेष बाब आहे. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. कवीविषयी : कवी डॉ. सदाशिव शेंडे यांनी चार विषयांत एमए केलेले असून समाजशास्त्रात त्यांनी पीएचडी केलेली आहे. ते लेखक कवी पत्रकार आणि संशोधक म्हणून पुण्यात कार्यरत आहेत. ‘अनुबंध क्षितिजाचे’ आणि ‘बिनकाचेचा बर्फ’ ही त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. कवी ग्रेस यांना ते आपले गुरु मानतात. त्यांनी अनेक कविसंमेलनात सहभाग घेतलेला आहे. शिवाय त्यांच्या लेखनाला अनेक मान्यवर पुरस्कारही मिळालेले आहेत.