सुमारे सहा दशके सामाजिक औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे. समाजाकडे तटस्थपणे पाहत त्यांनी टिपलेल्या निरीक्षणांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत असताना अनेक व्यक्तींबाबतचे अनुभव त्यांनी सहज ओघवत्या भाषेत मांडले आहेत. जीवनात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच पुस्तकेही खूप काही शिकवत असतात याबाबतचे अनुभव लक्षवेधक आहेत. देश-विदेशात प्रवास करताना त्या-त्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहेत. त्यातून समाजासाठी एक प्रकारचा सकारात्मक संदेशही दिला आहे.