महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रवासात येथील ग्रामीण भागामध्ये नेमके कोणते व कसे बदल झाले, विशेषतः येथील गावगाडा पद्धती काळानुरूप कशी बदलत गेली, याचा मागोवा घेणे रंजक ठरेल, हे ओळखून माजी प्रशासकीय अधिकारी व साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनपद्धतीतील बदलांचा आढावा या लेखसंग्रहात घेतला आहे. पोस्ट, रेल्वे, शाळा, आर्थिक देवाण घेवाण, भाषा, विवाह पद्धती, शेती, अशा विभिन्न बाबींमध्ये झालेले बदल टिपताना संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्नही त्यांनी यशस्वीपणे केला आहे. लेखक परिचय : शेखर गायकवाड हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी १९८७मध्ये कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या अधिकारी पदांवर काम केले. ते साखर आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी शेती, स्वस्त धान्य पुरवठा, महसूल, अशा विविध विषयांवर पुस्तकलेखन केले आहे.