‘भरून येणाऱ्या डोळ्यांतून’ हा ६८ पानांचा कविता संग्रह संवेदनशील मनाचे कवी अरुण कुमार जोशी यांनी लिहिलेला आहे. हा कवितासंग्रह वाचकाला मनात डोकावून पाहायला भाग पडतो. या त्यांच्या कवितासंग्रहात त्यांनी विविध विषयांच्या कविता लिहिल्या असून त्यात निसर्ग माणूस माणसाच्या मनातली हळवे अनुबंध आजूबाजचा भवताल त्यांनी त्यांच्या उत्स्फूर्त भाषेत टिपलेला आहे. त्यांच्या कविता या सहज आणि आशयघन आहेत. त्यात कुठेही उदासीनता डोकावत नाही. सूक्ष्म तरल संवेदना कवीने जाणीवपूर्वक टिपलेल्या दिसून येतात. सामान्यपणे आढळून येणाऱ्या कवितांपैकी या कविता नाहीत त्यांची शैली ही वेगळी आहे. त्यातून विश्वकल्याणाची समज स्पष्ट होते. अव्यक्त असलेल्या बऱ्याच गोष्टींचे संदर्भ त्यांच्या कवितेतून प्रगट होतात आणि मानवी भाव-भावनांचे अनोखे दर्शन त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबित होते. एकूण पन्नास कविता असलेला हा संग्रह वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेतो यात शंका नाही. कवीविषयी : कवी अरुणकुमार जोशी हे गेल्या तीन दशकांपासून सातत्याने काव्यलेखन करत असून त्यांचे ‘अंधारऋतुतील कविता’ ‘प्रतिक्षेच्या कविता’ आणि ‘एक एक घर कवितेचे’ हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. ‘पत्रास कारण की..’ हा पत्रसंग्रह देखील प्रकाशित आहे. विविध नियतकालिके मासिके आणि वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात. पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक या पदावरून ते निवृत्त झाले आहेत.