कालिदासानंतर जे संस्कृत वाङ्मय निर्माण झाले त्या वाङ्मयात भर्तृहरीच्या शतकत्रयी ची गणना होते. त्या काळातील अशी अनेक शतककाव्ये प्रसिद्ध आहेत. ह्या शतकांमध्ये 'शृंगार' प्रसिद्ध आहेत. ह्या शतकांमध्ये 'शृंगार' हाच मुख्य विषय असे. शृंगाराच्या या शतककाव्यामध्ये अमरूशतक प्रसिद्ध आहे. भर्तृहरीचे शृंगारशतक त्याच परंपरेतले. हा भर्तृहरी इ.स. ६५० मध्ये मृत्यू पावला असे‘इत्सिंग' ह्या यात्रेकरूने नोंदवून ठेवलेले आहे. भर्तृहरीविषयी खूपच दंतकथा आहेत. कोणी त्याला उजैनीचा राजाही समजतात. काहीवेळा त्याचा संबंध विक्रमादित्य राजाशीही जोडला जातो. यावरून इतकेच म्हणता येते की भर्तृहरी इसवी सनाच्या ७ व्या शतकात होऊन गेला. शृंगारशतक ज्या कवीने लिहिले त्यानेच नीती आणि वैराग्य शतके लिहिली आणि ही गोष्ट अशक्य नाही. भर्तृहरीने सातवेळा संन्यास घेऊन सातवेळा संसारात प्रवेश केला अशी एक आख्यायिका आहे ती खरी वाटू लागते. भर्तृहरीच्या तिन्ही शतकांचे समश्लोकी मराठी रूपंतर वामन पंडितांनी इ.स. १६८० ते १६९५ दरम्यान केलेले आढळते परन्तु भर्तृहरीप्रमाणेच वामनपंडित 'एक की दोन' हे वाद आहेतच. त्यामुळे निश्चित विधान करता येत नाही. येथे भर्तृहरीचे मूळ संस्कृत श्लोक त्याबरोबर वामनपंडितांचा समश्लोकी अनुवाद आणि नंतर मूळ श्लोकाचा मराठी गद्य अनुवाद दिला आहे. ह्या तीन पुस्तकांना 'शतक' असे जरी नाव असले तरी त्यात बरोबर शंभर श्लोक नाहीत. उदा. प्रस्तुत आवृत्तीत नीती शतकाचे एकशेसतरा श्लोक आहेत तर शृंगारशतकाचे एकशे आठ श्लोक आहेत आणि वैराग्यशतकाचे शंभर श्लोक आहेत. आहे. इतिहास काळातच निरनिराळ्या कवींनी आपली भर त्यात घातल्याने श्लोकांची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे.