महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील असे संत म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज! त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. ब्रह्मज्ञानाचे ध्येय गाठण्यासाठी वयाच्या बाराव्या वर्षी महाराजांनी गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरू केले. येहळेगाव येथील नाथपंथीय गुरू तुकामाईंकडे ते गेले. तुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ असे सांप्रदायिक नाव ठेवले व रामदासी दीक्षा दिली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीचा बोध केला. गोंदवलेकर महाराजांनी व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन कीर्तन या माध्यमांतून कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखी केले. तसेच अनेक लोकांना व्यसने दुराचरण दुराभिमान सांसारिक काळजी अशा समस्यांपासून मुक्त केले. सांसारिकांनी नेटका संसार करून परमार्थ कसा साधावा याचा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांचे चरित्र वाचून आजही कसे जगावे आणि कसे वागावे याची प्रेरणा मिळते.