श्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा दुसरा खंड. प्रस्तुत खंडात आठवा अध्याय ''अक्षरब्रह्मयोग'' पासून अठरावा अध्याय ''मोक्षसंन्यासयोग'' पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त पुराणकथा गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त दृष्टान्तकथा कौटुंबिक-सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. गीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो. सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणून भगवद्गीतेला जगात सर्वदूर मान्यता आहे. अनेक देशी-विदेशी विचारवंतांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर आपलं जीवन घडवलं आहे. गीताविचार समजून घेऊन त्यानुसार कृती केली तर व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक प्रश्न सहज दूर होऊ शकतील आणि खऱ्या अर्थाने मानवतेची प्रस्थापना होऊ शकेल. या दृष्टीने प्रस्तुत भाष्य नव्या पिढीसाठी पथदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. लेखकाविषयी माहिती : राजेन्द्र खेर साहित्यिक अभ्यासक आणि निरूपणकर्ते आहेत. प्राचीन भारतीय शास्त्रांचे अभ्यासक. त्यांचे ''गीताशास्त्र'' ''दैनंदिन भगवद् गीता'' ''बृहत् गीताशास्त्र'' हे ग्रंथ प्रकाशित. अध्यात्म श्रीमद् भगवद्गीता महाभारत यांतील विविध विषयांवर जवळपास ५०० व्याख्याने. ऐतिहासिक-पौराणिक-चरित्र कादंबऱ्यांचे लेखक. चित्रपट क्षेत्रात त्यांनी नऊ वर्षे लेखन-दिग्दर्शन निर्मिती अशा विविध क्षेत्रांत काम. ‘मायबोली’ वाहिनीवर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आजवर १५ पुस्तके प्रकाशित.