१९७७ साली वरदा प्रकाशनाने ( सरिता प्रकाशन ह्या त्यांच्याच जोड प्रकाशन संस्थेतर्फे ) एक कादंबरी स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत चिंचवड येथील लेखक प्र. द. तथा प्रभाकर मराठे यांच्या सामाजिक कादंबरीने प्रथमक्रमांक मिळवला आणि ती प्रसिद्ध केली गेली. त्यानंतरही त्यांची छोटी मोठी काही पुस्तके पुढे वरदा प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. ह्या काल्पनिक कादंबरीत मुंबईच्या गिरगाव सारख्या उच्चभ्रू परिसरातील एका स्त्रीला एक पुरुष कुमारीमाता करून पुढे तशीच वाऱ्यावर सोडून देतो आणि आपण भूमिगत होतो म्हणजे पळून जातो. पण तिच्या पूर्वीपासून बालपणीचा ओळखीचा दुसरा एक माणूस तिचा 'नकली नवरा' म्हणून भूमिका स्वीकारतो आणि हळूहळू तोच कसा गाळात जातो...हेच ह्या कादंबरीत दाखवलेले आहे.. वाचक ही कादंबरी वाचताना कंटाळा करणार नाहीत इतकी ती प्रवाही भाषेत लिहिलेली आहे. म्हणून तर तिला 'सरिता प्रकाशनाने' प्रथम क्रमांक दिला आणि तेंव्हा (१९७७ मधे) ती प्रकाशित केली गेली.