काही फुले चिरंतन असतात ती कधीच कोमेजत नाहीत. अशाच काहीशा फुलांचा दरवळणारा सुंगंध माझ्या स्वर्गीय वडीलांच्या कवितांतून आल्यासारखा मला भासतो. या सर्व कविता वडीलांनी ६० च्या दशकांत लिहिलेल्या आहेत. साधारण वय वर्ष १७ ते २८ असेल. गावी पाहिलेले निसर्ग सौंदर्य लहान वयातच पितृछत्र हरपल्याने आलेली कुटुंबाची जबाबदारी गावच्या बालमित्रांच्या आठवणी समाजात दिसणारी विषमता नोकरी सांभाळून पूर्ण केलेले महाविद्यालयीन शिक्षण तारुण्यातील प्रेमाच्या कल्पना अव्यक्त प्रेम चीन - पाकिस्तान यांचे भारतावर आक्रमण जिल्हा परिषदेची स्थापना आणि काम करण्याची तळमळ लग्ना नंतर जोडीदाराच्या येण्याने जीवनाला आलेले पूर्णत्व पहिल्या बाळाची चाहूल अशा अनेक नाजूक क्षणांची पार्श्वभूमी त्यांच्या या कवितांना आहे. नोकरी सततच्या बदल्या कौटुंबिक जबाबदारी या सर्व फेऱ्यात अडकल्यामुळे नंतर त्यांना कविता लिहिता नाही आल्या. त्यामुळेच त्यांनी कवितेस या त्यांच्या रचनेतून कवितेला घातलेली आर्त साद आपण समजू शकतो. त्यांची कवितांची वही पण खूप जूनी आणि जीर्ण झाली आहे. ते गेल्यानंतर कपाट आवरताना त्यांची कवितांची वही सापडली आणि एक-एक कविता वाचतांना वाटून गेले कि काय प्रतिभावंत होते आपले बाबा. ते असताना त्यांच्या या एवढ्या सर्व कवितां बद्दल ते स्वतः हुन कधी बोललेच नाहीत. कधीतरी विवेक किंवा आसावरी या कविता ऐकावीत. ते असताना त्यांच्या तोंडून या सर्व कविता ऐकायला काही औरच रंगत आली असती. आता ते आपल्यात नाहीत त्यामुळे त्यांच्या या कवितांना चिरंतन करण्याचा हा एक प्रयत्न. त्यांना ही छोटीशी काव्यांजली! माझ्या स्वर्गीय वडीलांच्या या कविता तुम्हाला नक्कीच एक वेगळी अनुभूती देतील.