छत्रपती संभाजी महाराजपुत्र शाहुमहाराज यांना छत्रपतीपद प्राप्त झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ देशमुख - भट यांच्या मृत्युनंतर श्रीमंत बाजीराव पेशवे या पहिल्या बाजीरावांस पेशवेपद प्रदान केले. त्यांनी बाजीरावांची पेशवेपदी नियुक्ती करतानाच उद्गार काढले 'लाखभर सैनिक आणि बाजीराव पेशवे ह्यांच्यापैकी मी बाजीरावास पसंत करीन.' एवढा गाढा विश्वास ज्यांच्यावर होता अशा श्रीमंत पहिल्या बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू म्हणजेच 'अनंत बाळाजी भट' उर्फ 'चिमणाजी' अथवा ‘चिमाजीअप्पा' होत.बाजी-चिमाजी यांच्या मातुश्री राधिकाबाई यांनी दोघा मुलांची नांवे लाडाने 'राऊ' (म्हणजे पोपट) आणि 'चिमणा' (म्हणजे चिमणीचे पिल्लू) अशीच ठेवली होती आणि तीही दोघांच्या मूळ नावाइतकीच प्रसिद्ध आहेत.ह्या दोघां सख्ख्या भावांची कारकीर्द एकत्रच फुलली आणि गाजलीही तशीच या दोघांचीही हयात एकाच वर्षी संपुष्टातही आली. हा नियतीने घडविलेला दारूण योगायोगच म्हणायला हवा. पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर फक्त आठच महिन्यानंतर चिमाजीअप्पाही बंधुवियोगाने निधन पावले. त्यानंतर खरं म्हणजे पेशवाई आणि पेशवे घराणे यांचे दोन बुरुजच ढासळले आणि पेशवाईच्या वैभवाची उतरती कळा सुरू झाली. नयनताराबाईंनी ह्या दोन्ही सख्ख्या पेशवे बंधुच्या आयुष्याचे कादंबरीकारूप चरित्र उलगडले आहे ते सर्व नवतरुणांसाठी प्रेरणादायी असेच आहे. कौटुंबिक एकी कशी असावी याचे हे चरित्र उत्तम उदाहरण आहे.