डिजिटल जर्नालिझम या पुस्तकात नव्या युगाच्या डिजिटल माध्यमांची चर्चा केली आहे. भारतात डिजिटल पत्रकारिता प्राथमिक अवस्थेत आहे. मात्र डिजिटल माध्यमांची संख्या प्रचंड वाढली आहे. तथापि डिजिटल मीडिया आशयाच्या बाबतीत खूपच सुमार आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असल्याने राजकीय फायद्यासाठी हा मीडिया राजरोस वापरला जात आहे. डिजिटल मीडियाच्या राजकीय लागेबांध्यावरही हे पुस्तक प्रकाश टाकते. केंद्र सरकार वेळोवेळी आदेश काढून तसेच नियम बनवून डिजिटल माध्यमांना शिस्त लावायचा प्रयत्न करत आहे. मात्र डिजिटल मीडिया नियंत्रित करण्याचा आरोप करून केंद्र सरकारच्या हेतूवर शंका घेण्यात येत आहे याचेही तपशीलवार विवेचन या पुस्तकात आहे. भारतीय डिजिटल माध्यमात एकमेकांची नक्कल करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. कॉपी पेस्ट संस्कृतीमुळे ओरिजनल आशय या माध्यमात अपवादाने दिसतो. आशयाच्या भ्रष्ट नकलीबाबत या पुस्तकात मांडणी केली आहे. अलीकडच्या काही वर्षात डिजिटल माध्यमातून द्वेष आणि उन्मादाचे वातावरण निर्माण केले जात आहे. या विखारी द्वेषमूलक वातावरणाचा समाचारही या पुस्तकात घेण्यात आला आहे. डिजिटल मीडियाचे अद्याप आर्थिक मॉडेल तयार झाले नाही. अजून त्याला सर्वसामान्यांची विश्वासार्हता कमावता आली नाही. याचे या पुस्तकात तपशिलाने विश्लेषण केले आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही चुकीच्या प्रवृत्तीवरही पुस्तकात कोरडे ओढले आहेत. भारतीय माध्यमांचे झपाट्याने राजकीयीकरण होत आहे यावरही पुस्तकात चिंता व्यक्त केली आहे. माध्यमाचा ग्राहक असलेले लोक मात्र माध्यमाच्या चुकांवर पांघरून घालत आहेत. माध्यमाच्या या निष्क्रिय आणि निरुत्साही ग्राहकाचा आणि त्यांच्या बोटचेप्या भूमिकेचीही चिरफाड या पुस्तकात करण्यात आली आहे.