गंधाळलेली फुले या कथासंग्रहात एकूण सव्वीस कथा आहेत. या कथासंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी साहित्यातील थोर कथा लेखक भारत ससाणे यांची या कथासंग्रहाचे अचूक मूल्याबन करणारी प्रस्तावना लाभली आहे. या कथासंग्रहाची पाठ राखणही त्यांनी अतिशय अभ्यासू चिकित्सक पद्धतीने केली आहे. या कथासंग्रहाच्या अनुक्रमणिकेवरून ओझरती जरी नजर टाकली तरी विषयातील विविधता सर्व स्पर्शिकाता लक्षात येते. मानवी जीवन हे उन्नयनशील असते, नव्हे ते तसे असावेच हा विचार सतत जागता ठेवून या कथा लिहिल्या आहेत. त्यामुळे या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचल्यानंतर काहीतरी सकस आशयगर्भ वाचल्याचे समाधानच नव्हे तर वैचारिक खाद्य मिळाल्याची तृप्ती लाभते. या कथासंग्रहातील सर्वच कथा साध्या, सोप्या, सरळ परंतु रसाळ, ओघवत्या, प्रवाही भाषेत आहेत. पण या सर्वच कथा कोणत्याही वयोगटातील, लिंग, धर्मातील प्रत्येक वाचकास काही ना काही वैचारिक ऐवज देऊन जातात.