जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०) महात्मा फुले नावाने लोकप्रिय हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा (संस्कृत: महान आत्मा पूज्य) पदवी प्रदान केली होती. ''शेतकऱ्यांचे आसूड'' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.