हेमाद्रि' किवा हेमाडपंत देवगिरीचे यादव राजे यांच्या राजवटीत मुख्यमंत्री होते. त्याकाळी या पदाला 'करणाधीप' म्हणत असत. शके 1185 म्हणजे इसवी सन 1263 मध्ये पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु झाले व ते दहा वर्षात संपले. विठ्ठल मंदिराला आजही चौर्यांऐशीची शिला आहे. त्या शिलालेखात देणगीदारांच्या नावामध्ये हेमाद्रिचा उल्लेख आहे. त्यावरुन हेमाद्रिचा काल ठरवता येतो. हेमद्रि केवळ राजकारणी होता असे नाही. त्याने संस्कृतमध्ये 'चतुर्वर्ग चिंतामणी' हा प्रचंड ग्रंथ लिहिला आहे. त्यात व्रतांची माहिती दिलेली असून धार्मिकदृष्ट्या तो ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. कालिदासाच्या रघुवंश काव्यावर 'दर्पण' नावाची टीका हेमाद्री यांनी लिहिली आहे. 19 व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात शासकीय कागदपत्रांमध्ये व इतर लिखाणासाठी मोडी लिपी वापरत असत. त्या मोडी लिपीचा शोध हेमाडपंताने लावला याबाबत पुरावा आढळतो. हेमाडपंत इसवी सन 1272 पर्यंत; देवगिरीचा राजा 'रामचंद्र देव' याचा मुख्यमंत्री होता; असा उल्लेख आढळतो. 'चतुर्वर्ग चिंतामणी' ग्रंथात व्रतखंड हे प्रकरण आहे. त्यातील एक अध्याय 'राजप्रशस्ती' असा असून त्यात लढ़ाईचे वर्णन आले आहे. हेमाद्रिने राजा तोडरमल प्रमाणे जमीन महसुलाचीही व्यवस्था लावली होती. हेमाद्रीच्या नावावर 'कैवल्यदीपिका' नावाचा ग्रंथ आढळतो. हेमाडपंत हा मराठीवर प्रेम करणारा होता. त्याने मराठी भाषेतही ग्रंथ रचना केली होती. पण आता ती ग्रंथरचना उपलब्ध नाही. मुख्यमंत्री हेमाद्री हा परधर्माविषयी सहिष्णू होता. त्याने जैनधर्मियांना देवगिरी येथे मंदिर बांधायला मदत केलेली आढळते. हेमाडपंताने इमारत बांधण्याची विशिष्ट पद्धत शोधून काढली होती. त्या इमारतबांधणीच्या पद्धतीला आज हेमाडपंती मंदिरे असेच म्हणतात. हेमाडपंती पद्धतीने बांधलेली शेकडो भव्य मंदिरे सर्व दक्षिण हिंदुस्थानात आहेत. चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात त्याने मूर्तींचे देवालयाचे नानाविध प्रकार वर्णिलेले आहेत. हे सर्व पाहिल्यास राजकारण धार्मिक कार्य मोडी लिपी आणि स्थापत्य शास्त्र यामध्ये हेमाडपंताने केवढी मोठी कामगिरी केली होती है लक्षात येते. असे हे दुर्मिळ चरित्र अनेक पुरावे देऊन पाध्ये यांनी लिहिलेले आहे. ते पुन्हा मराठी वाचकांस सादर करताना वरदा प्रकाशनाला आनंद होत आहे.