सावंतवाडी संस्था भारतातील ५६५ संस्थानांपैकी एक आकाराने व लोकसंख्या पाहिल्यास लहान नाही व एवढे मोठे पण नाही. परंतु चौल राष्ट्रकूट बहामनी मोगल आदिलशाही कुतुबशाही इंग्रज व पोर्तुगीज या सर्व शत्रूबरोबर अनेक वेळा लढाया करून व समझोता करून स्वतःचे अस्तित्व टिकवणारे एकमेव संस्थान महानच म्हटले पाहिजे. अनेक संकटे आली तरी येथील प्रत्येक संस्थानिकांनी स्वतःचा स्वाभिमान न गमावता प्रत्येक वेळी यशस्वी तडजोड केलेली दिसून येते. रयतेला सुखी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणूनच महात्मा गांधींनी त्याला 'रामराज्य' म्हणून गौरविलेले होते. पोर्तुगीजांना सुद्धा त्यांनी गोव्याच्या बाहेर स्वतःची सत्ता वाढवू दिली नाही. राज्य करून गेलेल्या प्रत्येक संस्थानिकांनसुद्धा संस्थान सुस्थितीत ठेवायचा प्रयत्न केलेला दिसतो. हा सर्व पराक्रमी इतिहास आताच्या नवीन पिढीसमोर ठेवायचा मी प्रयत्न केलेला आहे. तसेच माझे बालपण तरुणपण येथेच गेल्याने मी हे माझे कर्तव्यच समजतो.