बी. आर. चोप्रा यांनी १९८९-९०मध्ये महाभारतावर प्रदीर्घ दूरदर्शन मालिका केली होती. ही मालिका सुरू असतानाच दै. 'सकाळ'मधून महाभारताचे वास्तव दर्शन घडवणारे भा. द. खेर यांचे 'महाभारत कथामृत' हे सदर सुरू झाले होते. या लेखमालेला तत्कालीन वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. कर्णवधानंतर चोप्रांनी ती दूरदर्शन मालिका आवरती घेतली होती. अर्थातच लेखमालाही तिथेच थांबवावी लागली होती. मूळ महाभारत समजून घेण्याच्या दृष्टीने या लेखमालेचे निश्चितच महत्त्व होते. दै. 'सकाळ'मध्ये प्रकाशित झालेली ती लेखमाला आता पुस्तकस्वरूपात प्रकाशित होत आहे.महाभारताच्या 'नीळकंठी' आवृत्तीवर आधारित हे कथामृत आहे. भांडारकर-संशोधित आवृत्ती आणि नीळकंठी आवृत्ती (कल्याण प्रत) यांमध्ये थोडा फरक आहे. तो भाग महाभारताच्या संशोधकांसाठी महत्त्वाचा आहे. तथापि संपूर्ण महाभारत कथा समजावून घेण्यासाठी हे 'कथामृत' नक्कीच उपयोगी पडेल.चुकीचा आणि कल्पित इतिहास लोकमानसामधून दूर करण्यासाठी हे 'महाभारत कथामृत' निश्चितच फायदेशीर ठरेल.