ह्या ग्रंथाचे नाव मराठ्यांच्या आपसांतील लढाया असे जरी देण्यात आलें असले तरी ह्या ग्रंथाचा उद्देश असा आहे की सुशिक्षित लोकांनी आजपर्यंत झालेल्या चुका दुरुस्त करून इतिहासासंबंधी आजपर्यंत प्रसिद्धीस आलेला सर्व पुरावा एकत्रित करून पुढच्या पिढीकरिता व त्याची सुधारणा करण्याकरिता शक्य ती उपाययोजना कशी करिता येईल यासंबंधी शेवटच्या प्रकरणांत जे उपाय सुचविले आहेत त्यासंबंधी शांतचित्ताने त्यांनी विचार करावा हा हेतू आहे. इतर सर्व सुधारलेल्या देशांत अशाप्रकारे रयतेची स्थिती सुधारण्याकरिता सुशिक्षित लोक यथाशक्ती प्रयत्न करीत असतात. मुसलमानी आणि मराठी साम्राज्यामुळे ह्या देशात राजा आणि शेतकरी याच्यामध्ये आयते बसून खाणारा असा जो एक वर्ग निर्माण झाला आहे त्यामुळे देशात उत्पन्न होणारी खनिज द्रव्ये आणि देशातील नद्यांचे पाण्याचा उपयोग प्रजेला जो व्हावा तसा होत नाही तो करिता यावाअशा प्रकारचा मार्ग सुशिक्षित संस्थानिकांना दाखवून देता येईल व इंग्रज सरकारचे देखील सहकार्य संपादन करिता येईल अशी योजना तयार करण्याची लायकी पुष्कळ विद्वानांमध्ये आहे. वास्तविक मराठी साम्राज्यात शूर पुरुषांनी शत्रूवर जितके जय मिळविले त्यापेक्षा त्यांच्या आपसांतील लढायाच जास्त आहेत. हे स्पष्ट करण्याकरिता मराठी साम्राज्याचा उदय होण्याची कारणे व नाश होण्याची कारणे दोन्हीही दाखवावी लागली. जो गृहस्थ आक्रोडाचे झाड लावितो त्या झाडाची फळे खावयास मिळतील याचाच त्या गृहस्थाला आनंद होतो तशी हल्लीच्या विद्वानांची स्थिती आहे. पुढील पिढीकरिता येव्हांपासून आपण काही उत्तम योजना आखून दिल्या तर आज नाही तरी दहावीस वर्षांनी प्रजेची स्थिती सुधारेल. मराठी साम्राज्याच्या नाशाची जी कारणे दिली आहेत ते हिंदुस्थानच्या लोकांचे दोष जरी कोणी कबूल करीत नाही तरी असल्या चुका पुन्हा कोणीही करू नयेत इतका जरी ह्या ग्रंथाचा उपयोग झाला तरी लेखकाच्या कामाचे सार्थक झाले असे तो समजेल.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.