कोविडच्या दुसऱ्या लाटेत सरकारी वैद्यकीय यंत्रणेचा बोजवारा उडाला. जवळपास प्रशासन लकवा असल्यासारखी स्थिती देशात दिसत होती तर शेतकरी आंदोलनाच्या काळात हे सरकार केवळ श्रीमंत उद्योजकांचा विचार करते अशा प्रकारची भावना बळावली होती. मात्र या दोन्ही संकटातून सरकार तरून निघाले. राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक राजकारणात अजेंडा निश्चित करण्यात भाजपला येणारं यश ही विरोधकांसमोरची मोदीकालीन मोठीच अडचण बनली. याच वातावरणात नव्या राजकीय शक्यतांचा शोध सुरू होता. त्या प्रयत्नांचा वेध मोदी २.० : राजकीय शक्यतांच्या शोधात या पुस्तकात घेतला आहे. २०१९ नंतर अप्रत्यक्षपणे का असेना भाजपनं विणलेल्या प्रस्थापित केलेल्या नरेटिव्हची दखल राहुल गांधी ते ममता बॅनर्जी अशा साऱ्यांनाच घ्यावी लागत होती. चंडीपाठ हनुमान चालिसा राम शिव अशा प्रतिकांभोवतीचं राजकारण मूळ धरत होतं. त्याचा स्पष्ट प्रतिवाद करून पर्यायी मांडणी करायची की त्याच नरेटिव्हच्या सोयीच्या आवृत्त्यांवर भर द्यायचा यातलं चाचपडलेपण विरोधकांत होतं. सहकार मंत्रालय त्याद्वारे देशात लाखो संस्थांचं जाळं विणण्याचा प्रयत्न आणि ओबीसी जातगणनेच्या आधारे धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देऊ पाहणारं मंडल २.० चं राजकारण अशा मोदीकालात स्थिरावलेल्या बदलात नव्या राजकीय शक्यता शोधायची नांदीही याच काळातली. मोदी सरकारला मात्र आव्हान असेल तर ते या सरकारच्या कारभाराचंच; अशा काळाची कहाणी या पुस्तकात आहे. लेखकाविषयी : श्रीराम पवार हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक असून सध्या सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक आहेत.