गोविंद नारायण माडगांवकर यांनी १८६३ साली लिहलेला हा ग्रंथ अपूर्व आहे. त्याकाळी युरोपातसुद्धा शहरांच्या माहितीची पुस्तके लिहिण्याची प्रथा पडली नव्हती. हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्याकाळी जी माहिती मिळण्यासारखी होती ती सर्व मिळवून माडगांवकरांनी आपला ग्रंथ सजविला आहे. या ग्रंथात मुंबईचा सर्व पूर्वइतिहास तर दिलाच आहे व १८६३ साली मुंबई जशी दिसत होती तसे यथार्थ वर्णन केले आहे. एकंदर पुस्तकाची विभागणी १५ प्रकरणात केली असून मुंबई शहराची वाढ कशी कशी होत गेली याचे यथार्थ दर्शन घडविले आहे. अर्थात १८६३ ची मुंबई आणि आत्ताची मुंबई यात जमीन-अस्मानाचा फरक आढळून येईल. तरीही १८६३ मध्ये मुंबईत ध्वनी प्रदूषण होतेच व ते कसे होते त्याचे वर्णनही ह्या पुस्तकात आढळून येईल. संस्कृत भाषेतील मुंबा देवी महात्म्य त्यांनी छापले आहे. त्यावेळी मुंबईत रेल्वे स्थापन होऊन नुकतीच १० वर्षे झाली होती व व्यापार वाढू लागला होता. प्राप्तीवरील कर तेव्हा नुकताच चालू झाला होता त्याचेही वर्णन या पुस्तकात आहे. मुंबई शहरात उद्योग कसे वाढत होते याचे वर्णनही मनोरंजक आहे. मुंबईच्या विकासात पा जमातीचाही मोठा हातभार लागला आहे. म्हणून पारशी लोकांच्या कामगिरीचे वर्णन माडगांवकर देतात. माडगांवकरांनी लिहिले आहे की मुंबईच्या लोकांस द्रव्याची तमा नाही. हे आजही खरे आहे.