नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लेखक श्री श्रवणकुमार लिहितात नेताजींच्या चरित्र लेखनासाठी मी त्यांच्या अनेक पत्रांचा अभ्यास केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यांच्या या प्रासंगिक आणि अनौपचारिक लेखनात अनेक सुवचने अनुस्यूत आहेत. तसेच आजच्या नवयुवकांना मार्गदर्शक ठरतील असे अनेक संदेशही त्या पत्रात विखुरलेले आहेत. तेव्हा त्यातील वेचक भाग एकत्रित करून हे पुस्तक सिद्ध केले.”सुभाषचंद्रांच्या विद्यार्थी दशेपासून तो आझादहिन्द सेनेच्या निर्मितीपर्यंतच्या काळातील विविध पत्रांतील निवडक अंशांचा या पुस्तकात समावेश आहे. काही उद्धृते त्यांच्या भाषणातील आहेत. त्यावरून नेताजींच्या विचारात परिवर्तन होत त्यात परिपक्वता आणि प्रगल्भता कशी आली ते दिसून येते. मात्र त्यांची जाज्ज्वल्य देशभक्ती आणि अविचल स्वातंत्र्यप्रेम या दोन गोष्टी त्यांच्या सर्वच पत्रांतून प्रकर्षाने जाणवतात. एकोणीसशे बेचाळीस मध्ये बर्लिन रेडिओवरून प्रसारित झालेल्या भाषणात ते म्हणतात “भारताला स्वातंत्र्य प्राप्त व्हावे या एकाच गोष्टीचा मला सतत ध्यास लागला आहे. अन्य कोणत्याही गोष्टीचा नाही.”त्यांचा हा ध्यास विद्यार्थीदशेपासूनच दिसून येतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही निवडक सुवचने प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत.- य. ना. वालावलकर