पहिल्या प्रेमाची आपल्या मनातील जागा काहीशी नाजूक जागा असते. लहानपणापासून एकमेकांना ओळखणारे एकत्र खेळलेले वाढलेले दया आणि सागर यांच्या प्रेमाची कथा या कादंबरीत दयाच्या गतकाळातील आठवणीतून साकारते. फेसबुकवर दयाची बाल मैत्रीण सागर हिची जवळपास १८ वर्षांनंतर फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि या आठवणींना सुरुवात होते. दयाचा भूतकाळ आणि या भूतकाळातील त्याचं सागर या मैत्रीणीशी असलेलं सर्वांगसुंदर नातं या कथानकातून उलगडत जातं. अर्थातच या प्रेमी जोडप्याला येणारी संकटं घरातील लोकांचा विरोध इतर सामाजिक आर्थिक घटक या साऱ्या पार्श्वभूमीवर नवोदित लेखक दयानंद लोणे यांनी तरुणांची मानसिकता त्यांचे भावविश्व अशा नात्याचा एकूणच आयुष्यावर होणारा सखोल आणि दीर्घकालीन परिणाम यावर अतिशय सखोल भाष्य केले आहे. जुन्या नात्याची आठवण करून देणारी घटना ते भूतकाळातील आठवणींचे तटस्थतेने वर्णन करणारा नायक अतिशय धडाडीचा आणि संवेदनशील असा आहे. आजच्या काळातील तरुणांच्या अनेक प्रश्नांना ही कादंबरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे स्पर्श करते.