सर्व सुजाण वाचकांना आपल्या देशात गाजलेले 'महाभारतीय युद्ध' नक्कीच माहिती आहे. पण त्यानंतर आपल्याच देशातील काश्मिर राज्यात थेट इ. स. ११४० पर्यंतच्या कालखंडात तितकेच मोठे ज्याला 'दुसरे महाभारतीय युद्ध' म्हटल्यास वावगे ठरू नये असे मोठे युद्ध झाले. फक्त 'त्या काळात भगवान श्रीकृष्ण यांनी पुन्हा अवतार घेतला नाही' इतकंच त्या कालखंडात त्या राज्यात जवळ-जवळ एकशे तीस काश्मिरी राजे-महाराजे त्या युध्दात लढले.... ज्यांची रसभरीत वर्णने राजकारणे वगैरे बरंच काही ह्या बहुमोल रणवर्णन आणि 'काश्मिरच्या इतिहासाची' माहितीही ह्या ग्रंथात महाकवी कल्हण ह्यांनी काव्यरूपात लिहून त्या काव्यग्रंथाला 'राजतरंगिणी' असे लालित्यपूर्ण शीर्षक दिले आहे.सन १९२९ पूर्वीच डॉ. ऑरियल स्टीन ह्या पुरातत्व संशोधकाने ह्या ग्रंथाचे गद्य इंग्लिश भाषांतर केले आहे आणि त्याचे मराठी भाषांतर 'माधवराव व्यंकटेश लेले' ह्यांनी केले. मुळात हा ग्रंथ संपादन करतानाच तेथे राज्य करणाऱ्या एकशे तीस राजांची नावानिशी यादीही ह्या ग्रंथाच्या अखेरीस दिली आहे ज्यांची थोडक्यात 'चरित्रे आणि चारित्र्येही' ह्या ग्रंथात आठ प्रकरणात विषद करून दिली आहेत. ज्या प्रकरणांना कवी कल्हण यांनीच 'तरंग' अशी उपमा दिली आहे. थोडक्यात काश्मिरच्या इतिहासाचा आढावा किंवा अभ्यास करताना ह्या ग्रंथाचा संदर्भ म्हणून उपयोग होईल अशी आशा आहे.