अमृता गणेश खंडेराव यांचे हे मनस्वी लिखाण प्रथमच पुस्तक रूपात समोर येत आहे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. नव-मध्यमवर्गीय समाजातील त्या एक जागृत संवेदनाशील स्त्री प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संवेदनशील जाणिवांचे प्रतिबिंब या लिखाणामधून आपल्यापर्यंत आता पोहचत आहे. या लिखाणाचे स्वरूप मुख्यत: छोटे जीवनानुभव त्यावरील भाष्यासहित वाचकांपर्यंत पोहचवणे असे आहे. त्यामुळेच त्या लिखाणाला काहीसे संवादी रूप आले आहे. तसेच काही प्रमाणात मूल्य जाणीव आग्रहपूर्वक सांगणारे हे लिखाण झाले आहे. लेखक लिहिता असणे पुरेसे नसते. तो समाजात किती सजगपणे कृतिशील आहे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. लिहिता लेखक हा व्यापक पातळीवर कृतिशील असेल तरच तो लेखक म्हणून सतत उत्क्रांत होत राहतो. त्याच्या जीवन अनुभवाचे अधिक सखोलपणे आणि तरलपणे आकलन करू शकतो. अमृता खंडेराव यांच्या लिखाणामधून ही सजगता जाणवते. म्हणूनच त्यांचे लिखाण वाचकाला समृद्ध करणारे आहे.लेखिकेविषयी : कथा, कविता, ललित, वैचारिक, सामाजिक, पथनाटक, बालसाहित्य, गाणी, स्लोगन, जिंगल्स, जाहिरात लेखन असे लेखनाचे विविध प्रकार अमृता खंडेराव यांनी हाताळले आहेत. दै.सकाळ, मिळून साऱ्याजणी, सेवा दल पत्रिका अशा विविध वृत्तपत्र आणि मासिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे.