शिवरायांच्या अद्भुतकाली सरदारबहाद्दरांनी प्रसंगी विलक्षण धाडसाची कृत्ये केली त्यांची चित्रे महाराष्ट्रीयांच्या डोळ्यांसमोर सदैव दिसावीत हा हेतू मनांत बाळगून त्यांपैकी साधतील तितकी चित्रं नाटकरूपाने काढावी असे वाटल्यावरून हे द्वितीय चित्र महाराष्ट्रीयांस मी अर्पण केले आहे. या दुसऱ्या चित्रांतील नायक सरदार बाजी देशपांडे हे आहेत. हे रणवीर जातीचे कायस्थ परभू असून दक्षिणेतील सह्याद्री पर्वतांतील बारा मावळांपैकी हिरडोशी मावळचे देशपांडे म्हणजे त्या कालचे यःकश्चित् कुळकर्णी होते अफजलखानाचे मरणानंतर शिवराजांनी कमाविलेल्या प्रांताचा बंदोबस्त करून आपला मोर्चा करवीर प्रांती पन्हाळगडाकडे फिरविला. या गडावर शिवराज असतां अफजुलखानाचा पुत्र फाजल व महाशूर शिद्दीजोहार यांनी मोठे महंमदी सैन्य घेऊन पन्हाळगडास सुमारे चार महिने वेढा घातला होता. त्या वेळी देशपांडे शिवराजांबरोबर होते. शिवराजांनी पन्हाळगडावरून मोठया चातुर्याने आपली सुटका करून घेतली. पुढे मराठ्यांचे सैन्य रांगण्याकडे जाण्यास निघाले तो त्यांच्या मागे यवनांचे सैन्य लागले. मराठ्यांचे सैन्य पन्हाळगडापासून तीन कोसांवर पावनखिंडीत आले तो त्यास मागून शिद्दी व फाजल येत आहेत अशी खबर लागली. या वेळी सरदार देशपांडेनी आपण पावन खिंडीजवळ पांचशे शेलके मावळे घेऊन राहतो व शिवराजांनी रांगण्याकिल्ल्याकडे जावे व किल्ल्यावर सुखरूप पोहोचल्याचा पांच तोफांचा इशारा करावा तेथपावेतो मोंगली सैन्याला खिंड ओलांडू देत नाही तरी असें करण्यास आपल्याला आज्ञा व्हावी अशी शिवरायांची विनंती केली. शिवराजांनी मोठ्या कष्टाने ही गोष्ट कबूल केल्यावर ते रांगण्याकडे जाण्यास निघाले. यवनसैन्याचे तीन वेळ हल्ले आले ते देशपांड्यांनी मोठ्या निकराने लढून परत केले; तरी रांगण्यावरल्या तोफा ऐकू येईनात. यवनसैन्य फार मोठे देशपाड्यांच्या जवळचे लोक थोडे तरी त्यांनी लढण्याची शिकस्त केली. त्यांना गोळ्या लागल्या डोक्याला मोठी जखम लागली तरी बहाद्दर लढतच होते. शेवटी एकदांचा तोफांचा इशारा ऐकू आला तेव्हा आपण स्वामिकार्य पूर्ण शेवटास नेले याबद्दल त्यांस मोठी धन्यता वाटली व त्यांनी प्राण सोडला. शृंगारिक संगीत नाटकांचा वीट येऊन नीतिवर्धक ऐतिहासिक सामाजिक नाटकग्रंथ निर्माण होऊन त्यांचे प्रयोग रंगभूमीवर होऊ लागले तर त्यांपासून समाजास मोठा फायदा होणार आहे असे माझे मत आहे.