गो. ना. दातार यांच्या शैलीनुसार या कादंबरीतील कथानक शालिवाहन शकाच्या आरंभीच घडते आणि हे कथानक 'प्रतिष्ठान' म्हणजे 'पैठण'च्या आसपास घडत असते. यातील कथानक रहस्यमय असून ते किल्ले भुयारे राजवाड्यातील कारस्थाने प्रवास यातून पुढे सरकते. अहिवंत दुर्ग त्यातील भुयार अंजनी दुर्ग रुद्र गढी अशा किल्ल्यातून आणि गढीतून कथानक घडत जाते. प्रत्येक प्रकरणाची रचना अशी केली आहे की पुढे काय होत जाणार याची उत्सुकता सतत वाढत जाते. २००० वर्षापूर्वीच्या कालखंडाचे चित्रण करायचे असल्यामुळे त्यावेळचे वातावरण निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. या कादंबरीत दोन वीरांची द्वंद्वयुद्धे आहेत व शंभर कुमारिकांचाही उल्लेख आहे. कादंबरी वाचता-वाचता तुमचे मन २००० वर्षापूर्वीच्या कालखंडात रंगून जाते. व चालू जगाचा तुम्हाला विसर पडतो. अशा प्रकारची ही रहस्यमय ऐतिहासिक कादंबरी तुम्हाला श्वास रोखून धरायला लावणारी आहे.श्री. गो. ना. दातार हे माझ्या कुमारवयात मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्यांच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता अद्भुत घटनांचा अखंड ठसठशीत प्रवाह व्यक्तीचित्रणे चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालिकामूर्ती व बंधुद्वेष अधिक आवडल्या. आपल्या नित्य जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स यांच्या कादंबर्यांवरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही. परस्थतेचा वास देखील या लेखनाला कधी आला नाही. उत्तम रुपांतर ही देखील एका मर्यादेत; पण नवनिर्मितीच असते. मराठी कादंबरीच्या विकासात दातारांचे ऋण कोणी ना मानो; मी मात्र वाड्.मयीन व्यवहाराकडे वाचकाला वाहून नेणारा एक प्रकांड साहित्यकार म्हणून त्यांना खूप मानतो. रहस्यकथांत रस असणाऱ्यांसाठी दातारांनी हा अमोल खजिनाच निर्माण करुन ठेवला आहे.- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)