'द जेनेटिक वेडिंग रिंग' ही विज्ञानावर आधारित ( सायन्स फिक्शन) व त्यातही जेनेटिक इंजिनियरिंग या विषयावरील जगातील आगळीवेगळी प्रेमकथा आहे. खेड्यातून शहरात आलेला अभिजित आणि शहरातच वाढलेली विनया केवळ ‘जेनेटिक इंजिनियर्स नव्हते. ते प्रेमी होते. त्यांनी एकत्रपणे ‘जेनेटिक मॉडिफाइड’ भुईमूग तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यात दोन जीन्स होते. एक विनयाने शोधलेला. दुष्काळातही चांगले पीक देणारा. आणि दुसरा होता अभिजीतने शोधलेला. पिकात बीटा कॅरोटीन अर्थात प्रो व्हिटॅमिन ए आणि लोह तयार करणारा. दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार होते. हे दोन जीन्स म्हणजे होत्या त्यांच्या ‘वेडिंग रिंग्ज’. या दोन्ही जीन्सच्या किंवा तंत्रज्ञानाच्या रूपाने वनस्पतीत म्हणजेच निसर्गात आणि अगदी मृत्यूनंतरही कायम एकत्र राहण्याची त्यांची इच्छा होती. पण युरोपात ‘जेनेटिक इंजिनियरिंग’ तंत्रज्ञानाने तयार झालेल्या गायीचे दूध प्यायल्यामुळे एका चिमुरड्या मुलीचा मृत्यू झाला. जगभरात खळबळ उडाली. तंत्रज्ञान ‘बॅन’ करा असा जोर वाढू लागला. हे तंत्रज्ञान वापरायचे की नाही, वापरले तर कुठे? कसे? निसर्गाची सीमारेषा ओलांडली तर काय होईल? अभिजित आणि विनयात मतभेद झाले. दोघे वेगळे झाले. पण पुढे अद्भुत घटना घडली. दोघांनी तयार केलेला भुईमूग कुठल्याशा शेतकऱ्याच्या शेतात वाढला होता. त्यानं शेतकरी कुटुंबाच्या जीवनात केवळ समृद्धी आणली नव्हती. तर अभिजित आणि विनयाला पुन्हा एकत्र आणलं होतं. दोघांचे दोन जीन्स त्या पिकात नांदत होते. हे बियाणं पुढेही पेरलं जाणार आणि जीन्सच्या रूपानं दोघे कायम एकमेकांसोबत राहणार. मृत्यूनंतरही... कधीच ताटातूट न होण्यासाठी.