जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लिहिलेले चार हजार दोनशे अभंग उपलब्ध आहेत. हे अभंग अर्थपूर्ण व विठ्ठलभक्तीने ओतप्रोत आहेत. प्रा. सुरेश गर्जे लिखित तुका आकाशाएवढा या चिंतनपर पुस्तकात तुकाराम महाराजांच्या निवडक ४१ अभंगांचा भावार्थ सांगण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांची भाषा त्या काळातील समाजाला साजेशी होती. मात्र त्यातील गर्भितार्थ लेखकाने अत्यंत साध्या सोप्या भाषेत सामान्यांना आकलन होईल अशा पद्धतीने उलगडला आहे. लेखकाने या अभंगांच्या केलेल्या विवेचनातून महाराजांचे श्रेष्ठत्व तर समजतेच पण संत तुकाराम महाराज हे जगद्गुरू का आहेत याची खऱ्या अर्थाने उकल होते. लेखकाविषयी : प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान अध्यात्म नीतिविषयक विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.